मुंबई – एल्गार परिषदेच्या संदर्भात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांची रवानगी आज न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. “एनआयए’च्या विशेष न्यायालयाने नवलखा यांना 22 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडे सुनावली.
नवलखा यांनी गेल्या महिन्यात दिल्लीत राष्ट्रीय तपास संस्थेसमोर शरणागती पत्करली होती. “एनआयए’ने त्यांना मंगळवारी मुंबईत आणले होते. आता त्यांना मुंबईतल्या ताळोजा कारागृहात ठेवले जाणार आहे.
नवलखा आणि इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात माओवाद्यांशी संपर्क असणे आणि सरकार उलथवून टाकण्यासाठी कारस्थान करण्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेमध्ये या सर्वांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी भीमा-कोरेगावची दंगल उसळली होती, असा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे.