पुणे(प्रतिनिधी) – करोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यभरातील कारागृहातून तात्पूरत्या स्वरुपात 17 हजार कैद्यांना सोडण्यात येणार आहे. त्यापैकी आतापर्यंत विविध कारागृहांतून 7 हजार 691 कैद्यांना सोडले आहे.
कारागृहात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून उच्च न्यायालयाचा मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यात एक समिती स्थापन केली होती. कच्चे कैदी आणि 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांची सुटका करण्यात यावी, अशी शिफारस केली होती. त्याप्रमाणे कैद्यांना सोडण्यात येत आहे. मात्र, मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील 184 जणांना करोनाची लागण झाल्याने नुकतेच गृहमंत्री अनिल देखमुख 17 हजार कैद्यांना सोडण्याची घोषणा केली होती.
अत्याचार, आर्थिक घोटाळा, मोक्का आदी गंभीर गुन्ह्यातील कैदी वगळता 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांनाही सोडण्यात येत आहे. 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगणारे मात्र यापूर्वी पॅरोलवर जाऊन वेळेत परत कारागृहात आले अशा 388 कैद्यांना सोडले आहे. 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा भोगणाऱ्या 2 हजार 205 कैद्यांना सोडले असून यातील 223 कैदी येरवडा कारागृहातील आहे. तर 5 हजार 105 कच्चा कैद्यांना सोडले असून त्यातील 388 कैदी येरवडा कारागृहातील आहे. आतापर्यंत 7 हजार 691 कैद्यांना राज्यातील विविध कारागृहांतून सोडले आहे.