पुणे: गांजाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून 120 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशाखापट्टनम् येथून मुंबईत विक्री करण्यासाठी गांजाची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रथमच अमली पदार्थाची एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांना विशाखापट्टनम् येथून मुंबईला गांजाची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महाडिक यांच्या पथकाने पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर सापळा रचला. त्यांना एक संशयीत स्कॉडा गाडी दिसून आली.
गाडी बाजूला घेऊन तपासणी केली असता गाडीत गांजा मिळून आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांनी शहाळे वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनातून इतर गांजा पुढे नेल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करून खोपोली जवळ त्या वाहनाला पकडेल. त्याची तपासणी करते वेळी शहाळ्यांच्या खाली लपवून ठेवलेल गांजा मिळून आला. या दोन्ही वाहनातून पोलिसांनी तब्बल 120किलो गांजा जप्त केला.