नगर – दिवंगत नेते राजीव गांधी यांनी कॉंग्रेसला दिलेले विचार पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जपले आहेत. करोनासारख्या संकटकाळात सरकराने स्थानिकांना मदत करतानाच स्थलांतरीत मजुरांना केलेली मदत अत्यंत प्रभावी ठरली, असे विचार पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केले.
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या स्मृतीदिनानिमित्त अहमदनगर शहर कॉंग्रेसच्यावतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. कॉंग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष ऍड.रामकृष्ण पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष फिरोज शफी खान, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते अज्जुभाई शेख आदी मोजके पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटाशी जग सामना करत आहे. लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र राज्य सरकारने या गंभीर प्रसंगी खंबीरपणे जनतेच्या दृष्टीकोनाने निर्णय घेतले, त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तसा ठराव शहर उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी यांनी मांडला, त्यास शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी अनुमोदन दिले. पक्षाच्या अन्य पदाधिकारी, सदस्यांनी ऑनलाईन बैठकीशी संपर्क करुन राजीव गांधींच्या स्मृतींना उजाळा दिला.