नगर -करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. ही मोठी आपत्ती आहे. परिणामी नगरकर जनता पाणीपट्टी व घरपट्टी देखील यावर्षी भरु शकत नाही. त्यामुळे महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन घरपट्टी व पाणीपट्टीही पूर्णत: माफ करावी, अशी मागणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आज केली.
दरम्यान, मागणीचा विचार न झाल्यास कोणत्याही क्षणी शिवसेनास्टाईल आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या मुद्यावर उपनेते राठोड यांनी आज महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा-उपप्रमुख गिरीष जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, अमोल येवले, माजी महापौर अभिषेक कळमकर, परेश लोखंडे, संतोष गेनाआप्पा, आनंद लहामगे, विशाल वालकर आदी यावेळी उपस्थित होते.
नगरमध्ये मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच करोनाचा शिरकाव झाला.
तेव्हापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने अर्थकारण बंद पडले. हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या जीवन -मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दैनंदिन घर चालविणेच जिकीरीचे झाले आहे. अशास्थितीत नगरकर पाणीपट्टी व घरपट्टी देखील भरु शकत नाही. त्यामुळे ती माफ करणेच गरजेचे असल्याची भूमिका राठोड यांनी यावेळी स्पष्ट केली.