श्रीगोंदा -करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असून गावाकडे येणाऱ्या शहरवासीयांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झाली आहे. ही बाब चिंताजनक असून त्यातच शहरातून आलेल्या तसेच त्यांच्या कुटुंबातील स्थानिक व्यक्तींकडून सूचनांचे पालन केले जात नसल्याने गावोगावी धाकधूक अधिक वाढली आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वत्र जिल्हाबंदी आणि फिजिकलअंतर राखण्यासह अनेक प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. करोना संकटामुळे देशात लॉकडाऊन होऊन तब्बल दोन महिने पूर्ण होत आले. परंतु, शहरातून खुसकीच्या मार्गाने गावाकडे येणाऱ्यांचा लोंढा अद्यापही थांबलेला नाही. उलट गेल्या आठवड्याभरात खुसकीच्या मार्गाने गावाकडे आलेल्या शहरवासीयांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.विशेष म्हणजे, मोठ्या शहरांत जे भाग “कंटेन्मेंट झोन’मध्ये समाविष्ट आहेत, त्या भागातून देखील गावाकडे येण्याचा “अगोचरपणा’ अनेकांनी केला आहे. केवळ पुण्यातूनच नव्हे तर मुंबईसह परराज्यातून देखील लोक तालुक्यात येत असल्याचे समजते.
या लोकांकडून “होम क्वारंटाईन’चे देखील पालन केले जात नसल्याच्या अनेक गावांमधील तक्रारी आहेत. शहरातून आलेले लोक आणि त्यांचे स्थानिक कुटुंबीय आरोग्य यंत्रणेला सहकार्य करीत नसल्याचे काही ठिकाणी आढळून आले असून यामुळे “आरोग्य योद्धयांना’ मनःस्ताप सहन करावा लागत आहे. श्रीगोंद्यात अद्याप करोनाचा शिरकाव झालेला नाही, ही समाधानाची बाब आहे. परंतु, पारनेर आणि दौंड (जि.पुणे) या तालुक्याच्या दोन्ही सीमांपर्यंत करोना आलेला आहे. दौंड (जि.पुणे) हद्दीत करोना बधितांचा आकडा वाढत असल्याने संपूर्ण तालुक्यासह विशेषतः भीमा नदी पट्टयातील नागरिकांच्या चिंतेत कमालीची भर पडली आहे.
प्रशासनाकडून करोनाचा शिरकाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, परंतु मोजक्या लोकांच्या चुकीची किंमत संपूर्ण तालुक्याला मोजावी लागू नये, हीच अपेक्षा आहे. प्रशासनाने खासगी वाहतूक रोखण्यासाठी अनेक ठिकाणी पूल बंद केले आहेत, परंतु लोकांनी तेथेही पर्यायी मार्ग शोधले असून दुचाकीची ये-जा सुरूच आहे.
अनेक ग्रामपंचायतींनी बाहेर गावाहून येणाऱ्या व्यक्तींना “होम क्वारंटाईन’ करण्यासह इतर गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. परंतु, काही गावांमध्ये ठराविक लोकांना शहरातून येऊनही विशेष “सूट’ मिळत असल्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. या बाबीकडे तालुका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात सर्वच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. परंतु, आता करोनाचे संकट तालुक्याच्या सीमांवर आले आहे, आणि याच दरम्यान लॉकडाऊन काहीसा शिथिल झाल्याने घराबाहेर पडणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे.एकीकडे विनाकारण घराबाहेर पडणारे स्थानिक, शहरातून नव्याने येणारे लोक, ग्रामपंचायती व इतर यंत्रणाचे या काळातील कामकाजावर नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले, तर श्रीगोंद्यात करोनाचा शिरकाव रोखला जाऊ शकतो. त्यामुळे एकाचवेळी विविध पातळ्यांवर त्यांना काम करावे लागणार आहे.