नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेला तिस-या टप्प्यातील लॉकडाउन सोमवारी संपत असून त्यानंतर घरगुती विमान उड्डाणांसह महाविद्यालय आणि शाळा सुरू करावी. तसेच सर्व व्यवहार खुले करून जनजीवन सर्वसामन्य करावे, अशी मागणी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यांत चौटाल यांनी केली आहे.
असोचॅमने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते. चौटाला म्हणाले, 18 मे पासून लॉकडाउनचे सर्व निर्बंध हटविले जाऊ शकत नाहीत. तथापि, काही विशिष्ट निर्बंधासह नियमांना शिथिलता देण्यात यावी. तसेच करोनाबरोबर राहण्याची सवय लावत दैनंदीन व्यवहारांना मोकळीक दिली. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी काही निर्बंध असले पाहिजेत. विमानसेवेच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध हवेत. पण स्थानिक उड्डाणे आतापर्यंत सुरू व्हायला हवी होती, असे चौटाला म्हणाले.
हरियाणामधील ऑरेंज आणि ग्रिन झोनमध्ये वाहतुक सेवा सुरू करण्यात आल्याने येथील व्यवहार पुन्हा सुरळीतपणे मार्गावर येत आहे. यासाठी करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या सर्व राज्यांची निवड करावी. याशिवाय फक्त शाळाच नव्हे तर विद्यापीठेही उघडली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.