नवी दिल्ली – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत पायी घरी निघालेल्या स्थलांतरित मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यातील काही मजुरांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला.
लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांचे हाल होत असल्याचा मुद्दा राहुल यांनी सातत्याने लावून धरला आहे. अशातच त्यांना अचानकपणे पायी चालणारा सुमारे 20 मजुरांचा एक गट आढळला. त्यामध्ये काही मुलांचा आणि महिलांचाही समावेश होता. त्या मजुरांशी राहुल यांनी रस्त्यालगतच्या फुटपाथवर बसून तासभर गप्पा मारल्या. त्यांनी मजुरांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तसेच, त्यांना घरी पोहचण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही दिली. त्यासाठी दिल्ली कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले. मात्र, राहुल यांनी संवाद साधलेल्या काही मजुरांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. ती कारवाई करण्यासाठी पोलिसांना वरून आदेश आल्याचा दावाही कॉंग्रेसने केला.
मात्र, त्या पक्षाने केलेल्या आरोपावर दिल्ली पोलिसांची प्रतिक्रिया तातडीने मिळू शकली नाही. राहुल यांनी संवाद साधलेले मजूर उत्तरप्रदेश-मध्यप्रदेश सीमेवरील गावांत राहत असल्याचे समजते.