नवी दिल्ली – लॉक डाऊनमुळे अडकून पडलेल्या स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर अनेक नागरिकांना मूळ गावे असलेल्या राज्यांमध्ये पोहोचविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक गाड्यांच्या वाहतुकीद्वारे गुरुवार 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी आपापल्या मूळ राज्यांमध्ये परतले आहेत.
जे राज्य प्रवाशांना पाठविणार आणि ज्या राज्यांमध्ये प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्य सरकारांचे प्रवासी पाठवण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊन त्यांनी प्रवासाला संमती दिल्यानंतरच रेल्वे विभाग या विशेष गाड्यांची वाहतूक सुरू करत आहे.
मूळ गाव असलेल्या राज्यात पोहोचू इच्छिणाऱ्या प्रवाशांना घेऊन या 800 श्रमिक विशेष गाड्या आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोरम, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमध्ये पोहोचल्या असून तेथे त्यांचा प्रवास संपूर्ण झाला आहे.
श्रमिक विशेष गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व प्रवाश्यांची व्यवस्थित तपासणी झाली आहे याची खात्री केल्यानंतरच त्यांना या गाडी मध्ये प्रवेश देण्यात येतो आहे. प्रवासादरम्यान या प्रवाश्यांना रेल्वे विभागाकडून मोफत भोजन आणि पाणी पुरविले जात आहे.