मुंबई – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल जाहीर केलेल्या पॅकेजवर गुंतवणूकदार नाराज असल्याचे चित्र शेअर बाजारात होते. त्यामुळे शेअर बाजार नर्देशांकत घट नोंदली गेली.
गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 885 अंकांनी म्हणजे दोन टक्क्यांनी कोसळून 31,122 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 240 अंकांनी म्हणजे अडीच टक्क्यांनी कोसळून 9,142 आणि अंकावर बंद झाला. भारतातील लॉक डाऊनचा परिणाम जास्त असताना सरकारने थेट मदत केली नाही. त्याचबरोबर जाहीर केलेली मदत कमी आहे असे गुंतवणूकदारांना वाटत असल्याचे दिसून आले.
त्याचबरोबर करोना व्हायरस कधीच जाणार नाही असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केले असल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजाराबरोबरच जागतिक शेअर बाजारावरही झाला. आज झालेल्या विक्रीचा परिणाम माहिती-तंत्रज्ञान, ऊर्जा, तंत्रज्ञान, वित्त, ऑटो, बॅंकिंग, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा क्षेत्रावर झाला. या क्षेत्रांचे निर्देशांक साडेतीन टक्क्यापर्यंत कमी झाले.
याला अपवाद ग्राहक वस्तू, आरोग्य क्षेत्र आणि भांडवली वस्तू क्षेत्राचा होता. बीग व स्माल कॅप गुरुवारी 0. 63 टक्क्यापर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. गुरुवारी टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स, एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर घसरले. तर हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर वाढले. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले की, काल जाहीर झालेल्या पॅकेजमुळे गुंतवणूकदार फारसे उत्साही झालेले दिसत नाहीत. आता गुंतवणूकदारांचे लक्ष आगामी काळात जाहीर होणाऱ्या पॅकेजवर आहे.