नगर (प्रतिनिधी) – भाजी व फळबाजार नेप्ती येथील उपबाजारात स्थलांतरीत करण्याच्या कथित निर्णयास आमदार संग्राम जगताप यांनीही प्रखर विरोध दर्शविला आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मार्केट यार्डमधील व्यवसायच सोयीचा आहे. त्यामुळे हा निर्णय होऊ देणार नसल्याचे आश्वासन जगताप यांनी आज व्यापाऱ्यांना दिले.
नगरच्या मार्केट यार्डमधील भाजी व फळबाजार नेप्ती येथील उपबाजारात हलविण्याचा घाट समितीच्या संचालक मंडळाने घातला आहे. त्यास व्यापारी व शेतकऱ्यांचा विरोध आहे. तथापि, उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. जगताप यांनी आज या व्यापाऱ्यांशी चर्चा केली. व्यापारी नंदकुमार शिकरे, नंदकुमार गोरडे, संतोष सूर्यवंशी यांच्यासह आडते व्यापारी यावेळी उपस्थित होते.
बाजार समितीच्या कथित निर्णयाची माहिती आमदार संग्राम जगताप यांना दिली. भाजी व फळबाजार नेप्ती येथील उपबाजार समितीच्या आवारात स्थलांतरीत करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासंदर्भात व्यापाऱ्यांना धमकावले जात असल्याचेही त्यांनी जगताप यांना सांगितले. अर्थात ही धमकी कोण देत आहे, यासंदर्भात कोणीही उघडपणे बोलले नाही. या निर्णयामुळे व्यापारी भीतीच्या सावटाखाली आहेत. तसेच नेप्तीला हा बाजार कायमस्वरूपी हलविला गेल्यास त्याचे अनेक दूरगामी परिणामही नगरकरांना सहन करावे लागतील, अशी भावना व्यापाऱ्यांनी मांडली. त्यानंतर आमदार जगताप यांनी व्यापाऱ्यांना भाजी व फळबाजार स्थलांतरित होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.