भोर -परराज्यात बसने प्रवासला हिरवा कंदील दाखवल्यानंतर वेळू (ता. भोर) येथून पहिली बस 25 प्रवासी घेऊन राजस्थानला रवाना झाली आहे. या बसला प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखविण्यात आला.
राज्यात कामधंद्या निमित्ताने आलेल्या मजूर व इतर नागरिकांना पुन्हा त्यांच्या राज्यात घरी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 कोटी रुपयांचा निधी परिवहन महामंडळाला दिला आहे. या बसेस या लोकांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे. संबंधित परराज्यातील मजूर व इतर नागरिकांनी मोफत प्रवासासाठी भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात अटी, शर्तींची पूर्तता करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले होते. त्यानुसार राज्यस्थान सरकारशी चर्चा झाल्यानंतर पहिली बस 25 प्रवाशांना घेऊन रवाना झाली आहे.
ही बस सॅनिटायिझ करण्यात आली होती. तर या प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून बसमध्ये बसविण्यात आले असून प्रत्येकाला मास्कही वाटप करण्यात आले.
परराज्यासाठी मोफत तर राज्यासाठी तिकिट
ही मोफत प्रवासाची सुविधा फक्त परराज्यांतील मजूर व इतर नागरिकांसाठी आहे. राज्यातील मजूरांना एस. टी. चे तिकीट घेवून स्वखर्चाने ज्याच्या त्याच्या जिल्ह्यापर्यंत सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
परराज्यातील मजूर व नागरिकांनी यासाठी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमाक, व करोना विषाणुची कोणतीही लक्षणे नसल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र तहसील कार्यालयात दाखल करावीत जेणेकरून पर राज्यातील लोकांची प्रवासाची सोय करणे सुलभ होईल.
– संग्राम थोपटे, आमदार
भोर आगारातून 60 एस. टी. बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भोर आगारातील सर्व वाहक-चालकांना कामावर हजर होण्याच्या सूचना केल्या असून आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याची तयारी भोर आगाराने केली आहे. भोर आगारात 110 चालक व तेवढेच वाहक असून प्रत्येक बसबरोबर दोन कर्मचारी असणार आहेत.
– बी. एम. सूर्यवंशी, आगार प्रमुख, भोर