जामखेड (प्रतिनिधी) : कोरोनाचा धुमाकुळ, उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस अशा तिहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ जामखेड तालुक्यावर आली. तालुक्यातील नान्नज, जवळा, हळगाव, शिऊर, राजेवाडी, पाडळी, राजुरी सह अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारपिट व पाऊस झाला.
त्यामुळे या गावातील अनेक ठिकाणी लाईटचे पोल, घरांचे पत्रे व झाडे उन्मळून पडली. तसेच नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले आहेत. ठिकठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे
सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडालेला आहे. संपूर्ण लॉकडाऊन झाल्याने अस्थिर वातावरण आहे. त्यात जामखेड तालुक्यात उष्णतेची लाट सुरु झाली आहे. तापमान ४४ अंशावर जाऊन पोचले आहे. अशातच वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. उष्णतेसोबतच ढगाळ वातावरण देखील निर्माण होत आहे.
रात्री जोराने वारे वाहत आहेत रविवार दि १० रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानकच ढग दाटले. तालुक्यातील शिऊर, हळगाव. पाडळी, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, नान्नज , दैवदैठण, धोंडपारगाव, राजुरी, नान्नज, जवळा, राजेवाडी या परिसरात मोठय़ा प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपिट झाली.
जामखेड खर्डा या राज्य मार्गावरील राजुरी या ठिकाणी वादळाने वडाचे झाड रस्त्यावरच कोसळल्याने काही काळ जीवनावश्यक वाहनांची वाहतूक बंद झाली होती.
शहरातील बस स्थानका समोरील साईबाबा हॉस्पिटल समोरील रस्त्यावर चे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले.
तालुक्यातील पाडळी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे कोलमडून पडली असून गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील शिऊर येथिल बिंडा वस्ती वर देखील मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला.
जवळा या ठिकाणी देखील वादळाने अनेक घरांच्या पत्र्याचे शेड उडुन गेले आहे.जवळा व गोयकरवाडी परिसरात तूफान वादळी वा-यामुळे वीजेचे खांब देखील मोडून पडले.
तसेच शिऊर येथिल शेतकरी सोमनाथ तनपुरे यांच्या पॉलीहाऊस चे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हळगाव, पाडळी येथे दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिट झाली. या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील शिऊर येथिल बसरवाडी येथील शेतकरी हरिभाऊ कडु यांच्या पाच शेळ्या गारपीटीने जागावरच मृत्यूमुखी पडल्या तर डिसलेवाडी बावी फक्राबाद येथील शेतकरी अमोल बिरंगळ, मंगल बिरंगळ, बाळू पवार, शहाजी कवादे, देवकर दगडे, दत्ता कारडे याच्या पाॅली हाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सर्वत्रच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने मोठ्या संकटात सापडला असताना आता हाता तोंडाशी आलेला घास गारपीटीने हिसकावून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडत आहे. या गारपीटीत टरबूज, खरबूज, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या लिबूनीच्या बागा उध्वस्त झाल्या आसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यात गारपीटीने झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच तालुक्यातील गारपिट झालेल्या भागात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट देऊन पहाणी केली आहे.
टरबुजांचे झाले नुकसान….
शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली आहेत. काहींनी टरबुज, खरबुज, काकडी या फळांची लागवड केली आहे. परंतु रविवारी झालेल्या गारांमुळे टरबुज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भाजीपाला, फळबागा यांना देखील फटका बसला आहे.