मेढा -करोनामुळे जावळी तालुक्यातील मेढा नगरपंचायत क्षेत्रासह 28 गावे कन्टेनमेंट झोनमध्ये आहेत. तेथे प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करत असले तरी शेतातील भाजीपाला चोरीस जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील 28 गावे कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केल्यापासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या गावांमध्ये किराणा आणि भाजीपाला विक्रीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे काही नागरिक रात्री वा पहाटे शेतात घुसून चोरी करत आहेत. काही जण तर शेतातील संपूर्ण मालाचा सुपडासाफ करत आहेत. मेढा, आगलावेवाडी, एकांततळे, मोहाट, पिंपरी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील कोथिंबीर, मेथी, मिरची, वाटणा, घेवडा, वांगी, सिमला मिरची असा भाजीपाला चोरीस गेल्याने शेतकऱ्यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊनमध्ये चांगला दर मिळत असतानाही भाजीपाला चोरीस जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत आहेत. त्यातच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे शेतकऱ्यांना गस्त घालण्यासाठी शेताकडे फिरकता येत नसल्याने चोरांचे फावले आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी पोलिसांवर असलेला प्रचंड ताण पाहता पोलीस ठाण्यात तक्रर न करता शेतकरी आपले दु:ख पचवत आहेत.