मुंबई – देशातील सर्वात महत्त्वाची शहरे जोडणारा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेमुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या महामार्गावर प्रस्तावित असलेल्या स्मार्ट सिटी व इतर सुविधांमुळे लाखोंच्या संख्येने रोजगारही मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज प्रॅक्टिसिंग इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स आणि टाऊन प्लॅनर असोसिएशन (पीईएटीए) च्या सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, दिल्ली-मुंबई या ग्रीनफिल्ड महार्मागामुळे या दोन्ही शहरांमधील अंतर कमी होणार असून प्रवासाचा कालावधी अवघ्या 12 तासांत होणार आहे.
हा महामार्ग हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील मागासलेल्या आणि आदिवासी भागांतून जात आहे. या ग्रीनफिल्ड महामार्गावर लेदर, प्लास्टिक, केमिकल आणि इतर उत्पादनांचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.
या क्लस्टर्समुळे राज्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होईल. या महामार्गावर नियोजित रस्त्यांच्या कडेला सुमारे 2,000 स्मार्ट शहरे आणि स्मार्ट व्हिलेज उभारण्यात येणार आहे. हा महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्ग प्रकल्पासाठीच्या एकूण 60 करारापैकी 32 करार याआधीच करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.