लखनौ – विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या उत्तरप्रदेशाच्या सुमारे साडेसहा लाख मजुरांना राज्य सरकारने आपल्या राज्यात परत आणले आहे, असा दावा मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी केला आहे. एका व्हिडिओ निवेदनात त्यांनी ही माहिती दिली. 28 मार्च पर्यंत आम्ही परत आणलेल्या मजुरांचा हा आकडा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने त्यासाठी हजारो बसेसची व्यवस्था केली होती असे त्यांनी म्हटले आहे. परत आलेल्या मजुरांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना प्रत्येकी हजार रुपयांचीही मदत दिली गेली आहे तसेच मोफत रेशनही देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, करोनाच्या विरोधात सारा देश एकसंधपणे लढा देत असताना विरोधक मात्र राजकारण करून हा लढा कमकुवत करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून गरीबांना मदत दिली जात आहे हे पाहून काही जणांच्या पोटात दुखू लागले आहे असे त्यांनी म्हटले आहे. असे नकारात्मक राजकारण करणाऱ्या नेत्यांना लोकांकडूनच उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील जनतेला विविध योजनांमधून पैसे देण्याबरोबरच राज्यातील 1 कोटी 47 लाख कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. 18 कोटी जनतेला दोन वेळा मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात आला असून त्यांना आता तिसऱ्यांदा हे अन्नधान्य दिले जात आहे. 30 लाख रोजंदारी मजुरांना एक हजार रुपयांचा भत्ता दिला गेला आहे. राज्यातील 88 लाख पेन्शन धारकांना आगाऊ स्वरूपात पेन्शन दिली गेली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.