पिंपरी – लॉकडाऊनच्या काळात अवघ्या एक किंवा दोन गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाण्यात होत होती. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्ह्यांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ५) तब्बल १९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर प्रशासनाच्या आदेश न पाळणाऱ्या ५१६ जणांवरही गुन्हे दाखल झाले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात नागरिक घराबाहेर पडत नसल्याने गुन्ह्यांची नोंद होत नव्हती. दररोज एक किंवा दोनच गुन्हे दाखल होत असे. शहराच्या इतिहासात प्रथमच २२ मार्च आणि २ मे या दिवशी एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. मात्र मंगळवारी डाऊन अंशतः शिथिल होताच शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
मंगळवारी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल ५१६ जणांवर गुन्हे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे बंदोबस्ताच्या ताणातून अद्यापही मुक्त न झालेल्या पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.