पुसेगाव -लॉकडाऊनमुळे विवाह रद्द झाल्याने छोटे मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. कर्ज घेऊन फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केलेले उत्तर खटाव परिसरातील शंभरहून अधिक तरूणही लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आले आहेत.
व्यवसायच बंद असल्याने बॅंकेचे हप्ते फेडायचे कसे या विवंचनेत ते सापडले आहेत. लाखो रूपये खर्च करून धुमधडाक्यात विवाह सोहळे साजरे करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो. करोनामुळे एप्रिल, मे महिन्यात होणारे विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ नागरिकांवर आल्याने विवाह मंगल कार्यालये, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड व्यापारी, केटरर्स, किराणा व्यापारी, फेटेवाले, फोटोग्राफर, वाजंत्री, घोडेवाले, भटजी, गजरे विकणाऱ्यांसह विविध घटकांना या व्यवसायातून मिळणाऱ्या सुमारे दीड ते दोन लाखांच्या निव्वळ उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा हंगाम पुरता वाया गेला आहे.
लग्नसोहळ्यावर विसंबून असलेले सर्व छोटो-मोठे व्यावसायिक त्यामुळे अडचणीत आले आहेत. “बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज घेऊन गेल्या वर्षापासून बुध येथे फोटोग्राफीचा व्यावसाय सुरू केला. मात्र लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभ व अन्य उत्सवही बंद झाल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून बॅंकेचे हप्ते कसे भरायचे व कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या, या विवंचनेत असल्याचे योगेश फरकुटे यांनी सांगितले.