शिरूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीला करोना व्हायरसमुळे जवळपास पंधरा लाख ते अठरा लाख रुपये महिन्याचे उत्पन्न बुडाले आहे. शेतकरी बाजार व भुसार मार्केटमुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा व्यापारी आणि शेतकऱ्यांना होत आहे. करोनामुळे बाजार समितीची गंगाजळी आटली आहे. त्यामुळे यापुढील काळामध्ये बाजार समितीला अडचणीचा डोंगर पार करून जावा लागणार आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिरूर मार्केट यार्ड, शिरूर नवीन मार्केट यार्ड, तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप उपबाजार आहेत. यामधून बाजार समितीला चांगले उत्पन्न मिळत असते. शिरूर बाजार समितीमध्ये रोज होणाऱ्या शेतकरी बाजार, दर शनिवारी आठवडे बाजार, आदींतून चांगले उत्पन्न मिळत असते. परंतु आठवडे बाजारावर व रोज भरणारा शेतकरी बाजारावर करोनाचा फास आवळला गेला आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्समुळे हा बाजार गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे. त्यात शिरूर बाजार समितीचे नवीन मार्केट यार्ड येथे शेळ्या-मेंढ्यांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. दर बुधवारी सुरू असलेला कांदा लिलाव हा कांदा व्यापारी यांना येणाऱ्या वाहतुकीच्या अडचणींमुळे लिलाव तात्पुरते बंद ठेवले आहेत. त्यामुळे ही मोठे आर्थिक नुकसान बाजार समितीला झाले आहे. शिरूर बाजार समितीत शिरूर तालुक्याबरोबर जवळच पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला माल घेऊन बाजार समिती आवारात येत असतात.
त्यात पुणे पनवेल, लोणावळा, हडपसर व इतर भागांतून अनेक गाड्या रोज भाजीपाला तरकारी व फळे घेण्यासाठी शेतकरी येतात. परंतु सध्या हे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यातूनही मोठी आर्थिक झळ बाजार समितीला बसली आहे. शिरूर व तळेगांव ढमढेरे यार्डवर भुसार माल सुरू आहेत. परंतु करोना विषाणूचा प्रादुर्भाव भीतीमुळे अनेक शेतकरी यार्डवर गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भुईमूग आदी शेतीमाल विक्रीसाठी येत नाही. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
शिरूर बाजार समितीचे मुख्य यार्ड शिरूर व उपबाजार तळेगांव ढमढेरे येथे यार्डवर दररोज ज्वारी, गहू, बाजरी, मका, हरभरा आदी शेतमालाची खरेदी विक्री होत असून शेतकऱ्यांनी दररोज सकाळी 7 ते 1 पर्यंत शेतमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सचिव अनिल ढोकले व बाजार समितीचे उपसभापती विश्वासराव ढमढेरे यांनी केले.
शिरूर बाजार समिती व तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप उपबाजारातही शेतकऱ्यांचा शेतीमाल आला नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर अवलंबून असलेले मजूर, हमाल, आडते, मापाडे, छोटे टेम्पो चालक, मालक, यासह अनेक पूरक घटक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
– संतोष भंडारी,
व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर.