पिंपरी : पिंपरी चिंचवड दिवसात गेल्या 41 दिवसांमध्ये प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या सहा हजार 545 जणांवर गुन्हे दाखल केले. यापुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. हा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 मार्च रोजी लॉकडाऊची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला. तसेच संचारबंदीही लागू केली. केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना यातून वगळण्यात आले.
त्यानंतर 14 मार्च रोजी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडतात. यामुळे खासगी वाहनांना रस्त्यावर आणण्यास मनाई करणारा आदेश पोलिसांनी काढला. एवढेच नव्हे तर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन देण्यास पेट्रोप पंप चालकांना सांगितले. मात्र तरीदेखील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे पोलिसांनी अशा टवाळखोरांवर भा. द. वि. कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात सुरवात केली आहे.
गेल्या 21 मार्च ते 29 एप्रिल या 41 दिवसाच्या कालावधीत पोलिसांनी भा. द. वि. कलम 188 अन्वये सहा हजार 545 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दुकाने सुरू ठेवणारे, मोकाट फिरणारे आणि मास्क न वापरणारे आदींचा समावेश आहे. तसेच यापुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१६४२ वाहने जप्त
पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही अनेकजण रस्त्यावरून दुचाकी वाहने घेऊन मोकाट फिरत होते. शहरातील अशा एक हजार 642 जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहन चालकांवर खटला दाखल करून न्यायालयात जाण्याबाबत समजपत्र वाहन चालकांना देण्यात आली आहेत. तरीदेखील वाहन चालकांची रस्त्यावरील संख्या कमी होताना दिसत नाही.