सातारा -राजस्थानमधील कोटा येथे आयआयटी कोचिंग क्लासेससाठी गेलेले तब्बल अडीच हजार महाराष्ट्रीय विद्यार्थी व काही पालक लॉकडाऊनमुळे तेथे अडकून पडले आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील 35 जण असून महाराष्ट्र सरकारने सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना तातडीने राज्यात परत आणावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील अडीच विद्यार्थी आणि काही पालक आयआयटीच्या शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वी कोटा जिल्ह्यात गेले आहेत. सध्या सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे राज्ये व जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे विविध राज्यांमधून गेलेले हजारो विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले आहेत. जनजीवन विस्कळीत झाल्याने हे विद्यार्थी व पालकांचे हाल होत आहेत. उत्तर प्रदेशातील तब्बल सात हजार विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले होते. मात्र, योगी आदित्यनाथ सरकारने दोनशे बसेस पाठवून त्यांना राज्यात परत आणले होते. मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा या राज्यांच्या सरकारांनीही उत्तर प्रदेशचा कित्ता गिरवला.
राजस्थान सरकारच्या आदेशानुसार कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अडकून पडलेल्या विद्यार्थी व पालकांना त्यांच्या राज्यांमध्ये परतण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना कोटा येथून परत आणावे. त्यासाठी राजस्थान सरकारला कळविणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची यादी कोटाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे विद्यार्थी व पालकांना त्वरित महाराष्ट्रात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली आहे.