पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवासादरम्यान 18 टक्के जादा टोल द्यावा लागणार
करोनामुळे उद्योगधंदे ठप्प आणि नोकऱ्यांवर टांगती तलवार असताना निर्णय
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगधंदे ठप्प असताना आणि नोकरी-व्यवसायांवर टांगती तलवार असताना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढवला आहे. ही जाचक करवाढ डोईजड होणार आहे, ही वाढ म्हणजे “दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीप्रमाणे आहे, असा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
सोमवारपासून (दि.20) पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल दरांमध्ये 18 टक्क्याने वाढ झाली आहे. 2004 साली हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18 टक्के दरवाढ करण्याचे ठरले होते. रस्त्यावरील ट्रॅफिक दरवर्षी 5 टक्क्याने वाढेल, असे या मागचे गृहितक होते.
सन 2004 ते 2019 या काळात या हिशेबाने कंत्राटदाराला 2,869 कोटी रुपये मिळणार, असे गृहीत धरून कंत्राट दिले गेले. प्रत्यक्षात कंत्राटदाराने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्याला 4,369 कोटी रुपये मिळाले जे गृहित धरल्यापेक्षा 1,500 कोटी रुपयांनी जास्त होते. एवढेच नव्हे तर ते कंत्राटदाराच्या खिशात गेले, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे. ही वस्तुस्थिती असताना परत जुन्याच 5 टक्के ट्रॅफिक वाढ या गृहितकावर आधारित ही 18 टक्के टोल दरवाढ केली आहे. जी अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे, असा वेलणकर यांचा आरोप आहे.
राजकीय पक्ष मूग गिळून गप्प
नवीन कंत्राट गेल्याच महिन्यात झाले आहे, त्यावेळी या सर्व बाबी विचारात घेऊन कंत्राट करणे आवश्यक होते. आता परत हे कंत्राट 10 वर्षांचे केल्याने आता त्यात बदल करणे शक्य नाही, असे सांगून राज्य सरकार आणि प्रशासन हात झटकून मोकळे होईल, असा दावा करत करोनाच्या संकटामुळे भविष्यात कोणते आर्थिक संकट उभे राहील या विवंचनेत असणाऱ्या व्यापार, उद्योग आणि सामान्य माणसाला ही टोलदरांमधील ही जाचक दरवाढ डोईजड होणार आहे; परंतु या विषयावर सगळेच राजकीय पक्ष मूग गिळून बसले आहेत हे उद्वेगजनक आहे, अशी टीका वेलणकर यांनी केली आहे.