मृतांचा आकडा 232 वर
मुंबई : राज्यात काल आणखी 472 नवीन करोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा 4 हजार 676 झाला आहे. या आजाराने राज्यात काल नऊ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 232 झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात करोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने शहरात करोना विषाणू चाचणीला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडीकल महाविद्यालयात ही प्रयोग शाळा सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या दुसरा तर शहरातील पहिला करोनाबाधित रूग्ण उपचारानंतर बरा झाला. त्याला काल नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
रायगड जिल्ह्यात 49 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यातले 34 पनवेलमध्ये तर 15 जण ग्रामीण भागातले आहेत. काल रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळून आले. रायगड जिल्ह्यातले सहा तालुके हॉटस्पॉट असल्याने तिथे सर्व निर्बंध कायम आहेत. उर्वरित तालुक्यात टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
सांगलीत करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर तो काम करत असलेली बॅंकेची इमारत सील करण्यात आली. बॅंक सील करण्यापूर्वी मनपाच्या पथकाने या बॅंकेतील 8 एप्रिल ते 18 एप्रिल अखेरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याच्या संपर्कात आलेल्या 98 लोकांची यादी महापालिकेला मिळाली आहे. पुढचे 14 दिवस बॅंक बंद ठेवली जाणार आहे.