मुंबई :– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २३० गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शनिवारी (एप्रिल १८, २०२०) महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
सध्या लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच व्हाट्सॲप पोस्ट्स मधून अफवा, चुकीची माहिती व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे नाशिक ग्रामीणमध्ये नोंद झालेल्या सर्व गुन्ह्यांची संख्या १० वर गेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीने, कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या, या विषाणूमुळे प्रादुर्भावित परिसर, याबाबत चुकीची माहिती कोणतीही खातरजमा किंवा उपलब्ध सरकारी माहिती बरोबर न तपासता, व्हाट्सॲप ग्रुपवरून पसरविली होती. ज्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याचा संभव होता.