नवी दिल्ली – देशात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने नुकतीच काही सूट जाहीर केली आहे. ही शिथिलता येत्या 20 एप्रिल पासून लागू होणार आहे. त्यात आता आणखीही काही सवलती देण्यात आल्या आहेत, त्यानुसार ग्रामीण भागातील घरबांधणी, पाणीपुरवठा, बिगर बॅकिंग वित्तीय संस्थांची कार्यालये सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. देशभरातील पतसंस्थांची कार्यालयेही सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या गृह विभागाचे सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, वन उत्पादने गोळा करणे आणि अदिवासींकडून जंगलातून केले जाणारे व्यवसाय सुरू करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. देशभरातील बिगर बॅंकिंग वित्त संस्था आणि पतसंस्थांची कार्यालये सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असली तरी तेथील उपस्थिती कमीत कमी ठेवावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. बांबु उद्योग, नारळ उद्योग, मसाले लागवड, त्यांचे पॅकेजींग विक्री आणि मार्केटिंग अशी कामेही पुन्हा सुरू करण्यास नवीन आदेशानुसार अनुमती देण्यात आली आहे. देशातील लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढवण्यात आली असून केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या सवलती 20 एप्रिल पासून लागू होत आहेत.