पंतप्रधानांचे आवाहन डावलले
पुणे – लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तरीही काही कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. पुण्यातील तीन कंपन्यांनी कोणतेही कारण न देता कर्मचारी कपात केल्यामुळे ऍड. राजेश इनामदार आणि ऍड. तोसिफ शेख यांनी संबंधित कंपन्यांना नोटीस पाठवली आहे.
या कंपन्यांनी जवळपास शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर, इतरांसाठी वेतन कपातीचीही घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना घरी रहावे लागत आहे. याच काळात त्यांच्यावर बेरोजगारीचं संकटही कोसळत आहे. आपत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संबंधित कंपन्यांवर कारवाई होऊ शकते.
कंपन्यांनी कोणतीही नोटीस न देता कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे आणि इतरांच्या वेतनात कपात जाहीर केली आहे. काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसवर ठेवले असून त्यांच्या भविष्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आल आहे. या कंपन्यांचा निर्णय हा बेकायदेशीरच नाही, तर असंवेदनशील आणि दंडात्मकही आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे, अशी मागणी नोटीसीद्वारे करण्यात आली आहे.