फिरण्यावरही निर्बंध ः नागरिकांना बाहेर न पडण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या मुंबई शहरातील विविध अतिसंवेदनशील भाग (कंटेंटमेंट झोन) संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असून संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत. या भागात कोणालाही फिरण्यावर पूर्णपणे निर्बंध लादले जातील.
तसेच अशा क्षेत्रांमध्ये निर्जंतुकीकरणाचा कार्यक्रम वेगाने आणि अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबईतील करोना प्रतिबंधक उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंग, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेख म्हणाले, कंटेंटमेंट झोन असलेल्या भागात भाजीपाला विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात भाजी खरेदीचे कारण सांगुन नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही दिवस करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील रस्त्यावर विनापरवाना बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहितीही शेख यांनी दिली.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात येईल.
या नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी पालिका आणि पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणुक करण्यात येणार आहे, असे सांगतानाच करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घरात सुरक्षितपणे थांबावे. भाजीपाला, किराणा आणण्याच्या सबबीखाली बाहेर पडू नये. करोना विरुद्धच्या लढ्यात मुंबईकरांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही शेख यांनी केले आहे.