पाच आडत्यांचे परवाने निलंबित : 22 गाड्यांना मार्केट यार्डात प्रवेश बंद
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने केलेले नियम धाब्यावर बसविणे 5 आडत्यांना आणि 22 टेम्पोवाल्यांना महागात पडले आहे. बाजार समितीने पाच आडत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तर, 22 टेम्पोना खरेदीसाठी बाजारात येण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होऊ नये, यासाठी बाजार रोटेशन पद्धतीने चालवण्यात येत आहे. एका दिवशी भाजीपाल्याचा व्यवहार होतो. तर, दुसऱ्या दिवशी फळे, कांदा आणि बटाट्याचा व्यापार होत असतो. आज शुक्रवारी फळे आणि कांदा, बटाट्याचा व्यापार होणे अपेक्षित आहे. तरीही भाजीपाल्याचा व्यापार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरकारी विभागातील चौघांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तर, करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरावे. गर्दी करू नये, याबाबतचा नियम न पाळणाऱ्या फळ विभागातील 1 आडत्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे बाजारात गर्दी होऊ नये, म्हणून खरेदीसाठी आलेल्या तीन आणि चार चाकी टेम्पोना टप्प्याटप्प्याने बाजारात सोडण्यात येत आहे. ते खरेदी करून गेल्यानंतर दुसऱ्या गाड्यांना बाजारात प्रवेश दिला जातो. मात्र, चुकीच्या पद्धतीने बाजारात प्रवेश करणाऱ्या आणि खरेदी केल्यानंतरही ही बाजारात थांबून राहणाऱ्या 22 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना बाजारात प्रवेश देण्यासाठी बाजार समितीने दिलेले परवाने काढून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे या गाड्यांना आता बाजारात प्रवेश करता येणार नाही.
याविषयी देशमुख म्हणाले, आत्तापर्यंत नियमांचे पालन न करणाऱ्यांना समजावून सांगण्यात येत होते. मात्र, आता त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी फळे, कांदा आणि बटाटा विभाग सुरू होता. बाजारात 530 वाहनांची आवक झाली. शहराला पुरेल एवढ्या कांदा आणि बटाट्याची आवक झाली आहे. उद्या शनिवारी बाजाराला साप्ताहिक सुट्टी आहे. रविवारी भाजीपाल्याचा व्यवहार होणार आहे. गर्दी होऊ नये यासाठी केवळ 400 वाहनांना बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. याचा विचार करून शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात आणावा. 400 पेक्षा जास्त गाड्या आल्या आणि त्याचे नुकसान झाल्यास त्याला बाजार समिती जबाबदार राहणार नाही.