न्यूयॉर्कमधील संशोधन संस्थेच्या अहवालाचा तपशील
पुणे – बॅसिलस कॅलमेट ग्युरिन अर्थात बीसीजी ही लस ज्या ज्या देशांत लहानपणीच टोचली जाते, आणि ज्या लसीमुळे श्वसनाचे ट्युबरक्युलॉसिस अर्थात टीबीसारखे विकार होण्यापासून बचाव होतो, त्या देशांत “करोना’विषाणूमुळे होणाऱ्या “कोव्हिड-19′ या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत, असे नवे संशोधन अमेरिकेत प्रसिद्ध झाल्याने, विशेषत: भारतीय नागरिकांसाठी ती आनंदाची बातमी ठरते आहे.
यासंदर्भात ऍरॉन मिलर, मॅक जोस रिऍण्डलर यांच्यासह अन्य चार शास्त्रज्ञांनी न्यूयॉर्क इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ ऑस्टीओपॅथीक मेडिसिन येथे केलेले संशोधन नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. इटली, नेदरलॅंड, फ्रान्स, इराण आणि अमेरिका या देशांनी बीसीजी लसीकरण काही दशकांपूर्वीच थांबवल्याने या देशांमध्ये करोनाबाधित मृत्यु पावलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला असून, त्याउलट भारतात अशा मृत्युंची संख्या लोकसंख्येच्या आणि साथीच्या गांभीर्याच्या दृष्टीनेही कमीच आहे. वर्ष 1948 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनाच या दूरदृष्टीचे श्रेय जात आहे, हेही यानिमित्ताने समोर आले आहे.
काय होते बीसीजीच्या लसीमुळे?
नवजात अर्भकाला बीसीजीची लस दिल्याने, त्याच्यावर टीबीचे जिवाणू हल्ला करु शकत नाहीत. मायकोबॅक्टेरियम बोविस या जिवाणूपासून ही लस बनवली जाते आणि या लसीचा प्रभाव प्रदीर्घकाळ असतो. यामुळे त्या बालकाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदतच होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्वच देशांना बीसीजीच्या लसीकरणाच्या अनिवार्यतेविषयीचे धोरण राबवायला सांगितले होते. मात्र, ज्या देशांनी हे धोरण राबवण्यास नकार दिला, त्या देशांमध्येच करोनामुळे झालेली मृतांची संख्या सर्वाधिक आहे, असे दिसून येत आहे.
अशी झाली चाचणी…
या संशोधनामध्ये इटली, अमेरिका, लेबनान, नेदरलॅंड आणि वेल्जियम या बीसीजी लस न वापरणाऱ्या देशांमधील करोनाबाधित आणि भारतासारख्या देशातील करोनाबाधितांच्या वैद्यकीय अहवालांची तुलना करण्यात आली. मग लोकसंख्येच्या तुलनेत त्या त्या देशात झालेल्या करोनाबाधित मृतांच्या संख्येचा विचार केला गेला. त्यातही अभ्यासासाठी निवडलेले देश कमी उत्पन्न, मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न गट अशा तीन गटात विभागण्यात आले. ज्या देशांनी खूप वर्षांपूर्वीपासून (भारत) बीसीजी लसीकरणाची परंपरा कायम ठेवली आहे, त्या देशांमधील वयाच्या साठीपलिकडच्या नागरिकांनाही कोव्हिड19 ची बाधा झालेली नाही किंवा असे काही रुग्ण लक्षणे दिसूनही पुन्हा पूर्वस्थितीत आलेले आहेत.
इटलीने बीसीजी लसीकरण कधीच अनिवार्य केले नव्हते त्याचा फटका या देशाला बसला असून तेथे 12 हजार 400 पेक्षा जास्त मृतांची संख्या आहे. तर जपानने वर्ष 1947 पासून बीसीजी लसीकरण अनिवार्य केल्याने तेथे मृतांची संख्या कमी आहे.
चीनमध्ये गोंधळ का झाला?
चीन हे राष्ट्रही बीसीजी लसीकरण करणारे राष्ट्र आहे. मग असे असताना तिथे मृतांची संख्या इतकी कशी, याचे उत्तरही या संशोधकांनी दिले आहे. तर वर्ष 1966 ते 1976 या 11 वर्षांच्या लाल क्रांतीच्या काळात चीनमध्ये सर्वच प्रकारच्या लसीकरणावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्या काळात जन्म झालेले आणि चाळीशी-पन्नाशीमध्ये असलेले अनेक नागरिक कोविड-19च्या संसर्गाला बळी पडले आहेत.