बारामती: लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत केवळ पोलिसांकडूनच दंडुके किंवा वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन सोडले जायचे. आता मात्र लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास तुम्हाला सरळ तुरुंगात जावे लागेल. कारण याचा प्रत्यय बारामतीमधील तिघांना आला आहे. विनाकारण बाईकवर फिरणे, दुकानदारांतडून सूचनांचे पालन न होणे, अत्यावश्यक सेवा वगळता उगाच बाहेर फिरुन संचारबंदीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे बारामतीत न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाकडून लॉकडाऊनच्या काळात कोणाला तरी शिक्षा मिळण्याचे हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे.
लॉकडाऊनचे पालन न केल्याबाबत बारामतीत बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी आज न्यायालयाने तिघांना शिक्षा दिली आहे. यात बारामती तालुका पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार अफजल बनीमिया आत्तार रा.श्रीरामनगर, चंद्रकुमार जयमंगल शहा रा.सुर्यनगरी ,अक्षय चंद्रकांत शहा रा.वडगाव निंबाळकर या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
ही शिक्षा थोडी किंवा छोटी वाटत असली तरी या व्यक्तींना भविष्यात चारित्र्य पडताळणीमध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही. त्याचबरोबर भविष्यात पासपोर्ट, शस्त्र परवाना , व्यवसाय परवाने मिळताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. आपल्या थोड्या चुकीमुळे आपले स्वतःचे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून गंभीरपणाने लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे, असे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी म्हटले आहे.