नवी दिल्ली: देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असे आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 100 वरून 1 हजार पर्यंत पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले. इतर प्रगत आणि विकसित देशात ज्यांची लोकसंख्या तुलनेने कमी आहे, तिथे ही संख्या एवढ्याच काळात आठ हजारापर्यंत पोहोचली होती. जनसहभाग आणि प्रतिबंधक उपायांमुळेच करोनाचा प्रादुर्भाव आपण आटोक्यात ठेवू शकलो असे अग्रवाल यांनी सांगितले.
देशातल्या कोरोनाग्रस्तांपैकी 99 टक्के रुग्ण बरे झाल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. देशातली एकूण रुग्णसंख्या 1 हजार 71 असून आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
“आयसीएमआर’च्या नेटवर्कअंतर्गत 115 लॅब कार्यरत आहेत आणि 47 खासगी लॅबना मान्यता देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 38 हजारांहून अधिक “कोविड -19’ची चाचण्या घेण्यात आल्या आहेत,असे आयसीएमआरचे मुख्य वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.