मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
चेन्नई – करोनाविरोधी लढ्यासाठी आणि लॉकडाऊनमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक दुष्परिणामांचा मुकाबला करण्यासाठी तमिळनाडूने केंद्र सरकारकडे 9 हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसे पत्र तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
लॉकडाऊनचे आर्थिक दुष्परिणाम तीव्र आणि अभूतपूर्व असू शकतील.
अशा अवघड काळात अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी अपारंपरिक स्वरूपाचे उपाय करण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना मिळून किमान 1 लाख कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करावा. तमिळनाडूसह विविध राज्यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहेत.
त्या पॅकेजना पंतप्रधान गरीब कल्याण योजना पूरक ठरली आहे. मात्र, आगामी काळात जनतेला दिलासा देण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज भासणार आहे, अशी भूमिका पलानीस्वामी यांनी मांडली आहे. आर्थिक विकासाला चालना देण्याबरोबरच विविध क्षेत्रांना पुन्हा विकासमार्गावर आणावे लागणार आहे. गुंतवणूक आणि मागणी वाढवण्यासाठीही पावले उचलावी लागणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.