काबूल: काबूलमधील शिखांच्या गुरुद्वारावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या गटाने स्वीकारली आहे. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट असल्याचे दहशतवादी गटांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या “साईट’ या गटाने म्हटले आहे. या भयानक दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांबद्दल गुरुवारी भारताने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
काबूलमधील भारतीय दूतावासाने अफगाण सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी सुरक्षा तसेच त्यांच्या घरी परतावे याची काळजी घ्यावी असे सांगितले असल्याचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले. बुधवारी या गुरुद्वारावर काही सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 25 शीख भाविक मरण पावले होते.