आपल्यापैकी कितीजणांना आपल्या भूतकाळाला काहीअंशी विसरून जाऊन आजचा दिवस माझा असे समजून घेऊन वर्तमानातील आनंद घेता येतो? असा आनंद आपण घेतो का? गतकाळातील घटना, अनुभव सहजपणे विसरणं शक्य नसतं; हे जरी कितीही खरं असलं, तरीही त्यांमध्ये मनानं गुरफटून राहणं देखील तापदायक ठरू शकतं, हे विसरून चालणार नाही. काही बाबतीत आपल्या पूर्वानुभवाचा उपयोग निश्चितच आपल्याला होतो, पण तसं नेहमीच अपेक्षेप्रमाणे घडतं असं नाही. हे जाणून घेण्याचा आपल्या मनात विचारही अनेकदा येत नाही. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी आपल्याला नवी उमेद देऊ शकतात, नवा विचार देऊ शकतात, अनुभवातील काही चुकांमुळे नवनवीन मार्ग देऊ शकतात. पण म्हणून त्यात आपण कितपत समरस, रममाण व्हायचं ह्याचंही भान राखलं पाहिजे.
दैनंदिन जीवन जगत असताना वर्तमानात आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज अनेकदा आपल्याला येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असणं आवश्यक असतं. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असणं स्वाभाविक असतं. आपापल्या अनुभूती आणि प्रचितीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो. आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारावर तो निर्माण कसा, किती आणि कधी होतो? ते अवलंबून असतं. आपल्या अंतर्मनातील विचारांमध्ये आपण गुरफटले जात असतो.
आपल्या अंतर्मनातील विचारांना विशिष्ट दिशा, गती अथवा विषय असतीलच असं नाही. दिवसभरात आपल्या मनात आलेले सर्वच विचार, तसं बघितलं तर, आपल्या लक्षात देखील राहात नाहीत. ह्या विचारमंथनात आपल्याला वर्तमानातील वास्तवाचं भान राहणं महत्त्वाचं असतं. पण भूतकाळाच्या साठवणीतील आठवणीत रमलेल्या आपल्या अंतर्मनाला दुसरीकडे भविष्याची काळजी, चिंता करायची देखील सवय जडलेली असते. आजचा दिवस माझा, ह्या भावनेतून, दृष्टिकोनातून आपले विचार, वर्तन, व्यवहार होण्याचं भान राहणं महत्त्वाचं ठरतं. आजच्या दिवसातील आनंद लुटायचा सोडून आपण उद्याची विवंचना, चिंता, काळजी, दडपण अशा सर्वच नकारात्मकता निर्माण करणाऱ्या विचारांना आपण कवटाळत बसत असतो. कशाला उद्याची बात? असा ठोस प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का हो? विचारलाच तरीही त्याचे सकारात्मक उत्तर आपल्याला मिळते का? हाच खरा कळीचा मुद्दा आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारांत सतत अडचणी, समस्या यायला लागल्या की आपण आपल्या नशिबाला दोष द्यायला लागतो. जेव्हा दोष नशिबाला दिला जातो तेव्हा चर्चा आपल्या कुंडलीतील ग्रह दोषांशी संबंधित व्हायला लागते. त्या विषयी मनात अनेक प्रकारच्या शंका यायला सुरुवात होऊ लागते. कुंडलीचा एक शास्त्र म्हणून विचार करायला काहीच हरकत नाही; परंतु काहीजण त्याच्या इतके आहारी जातात, की त्यांच्या प्रत्येक विचार, वर्तन, व्यवहारासाठी त्यांची कुंडली दाखवली, पाहिली जात असते. काहीजण घराचा उंबरासुद्धा कधी ओलांडायचा हे कुंडलीतील ग्रह स्थितीनुसार ठरवतात. कोणत्या वेळेला, कोणत्या दिवशी, कोणतं कार्य करायचं, ते कधीपर्यंत पूर्ण करायचं, त्यावेळी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे, कोणत्या दिशेकडे तोंड करून चर्चा, काम करायचं अशा अनेक बाबींचा प्राधान्यानं विचार केला जातो, त्या कृतीत आणल्या जातात. एखादी व्यक्ती ह्या सर्वाच्या इतकी आहारी कशी काय जाऊ शकते? हाच खरं तर कळीचा मुद्दा आहे.
ह्या कारणामुळे आत्मविश्वासाचं खच्चीकरण होत असतं, ह्याची देखील त्या व्यक्तीला जाणीव होत नसते. मनोबलाच्या जोरावर यश प्राप्त करू शकणारी एखादी व्यक्ती काहीवेळा ह्या चक्रव्यूहात अडकण्याची अधिक शक्यता असते, हे समजण्याचं त्या व्यक्तीला भान राहत नसतं, ह्याचं आश्चर्य वाटतं. कुंडलीच्या कुबड्यांवर चालायला सुरुवात झाली, की त्या सोडून स्वतंत्ररित्या स्वतःच्या पायावर चालणं हळूहळू कमी व्हायला लागतं; तेच कालांतरानं तापदायक, त्रासदायक, घातक ठरायला लागतं. एक शास्त्र म्हणून कुंडलीचा सखोल अभ्यास असणारे असे किती असतील, की जे प्रत्येकाच्या संपर्कात येऊ शकतात.
अन्यथा पत्रिका पाहण्याच्या बहाण्याने हजारोंचा गंडा घालणारेच जास्त असल्याचं समजतं. अशा कुडमुड्या ज्योतिषानं पत्रिका बघून केवळ त्याला एखाद्याचा भूतकाळ नीट सांगता येत असेल, वर्तमानाच्या संबंधित समस्या तर आपण स्वतःहूनच सांगितलेल्या असतात पण भविष्यात काय घडणार आहे हे अगदी तंतोतंत सांगू शकणारे असे किती कुडमुडे ज्योतिषी असतील. त्यांनी केलेल्या आपल्या भविष्यातील भाकितांमुळे दु:खी होण्यापेक्षा जीवनात आत्मिक आनंदाभूती प्राप्त करणं महत्त्वपूर्ण असतं. ही आनंदानुभूती आपल्या जगण्यापलीकडच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची, आवश्यक म्हणूनच गरजेची असल्याचं समजून घेणं जरुरीचं असतं.
विद्यानंद