अखेरच्या क्षणीही कोर्टबाजी
नवी दिल्ली – शुक्रवारी सकाळीच निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात आल्याची बातमी पसरल्यानंतर कारागृहाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. त्यातील काही जण हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन आले होते. निर्भया अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा यावेळी उपस्थितांकडून दिल्या जात होत्या. काहींनी तेथे मिठाई वाटपही केल्याचे पहायला मिळाले. तत्पुर्वी या चार आरोपींपैकी एकाने शेवटचा उपाय म्हणून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज केला होता. त्यावर रात्री अडीच वाजता सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांपुढे सुनावणी झाली पण त्यांचा हा अर्जही त्यावेळी फेटाळला गेला.
तिहारच्या कारागृहाबाहेर जमलेल्या लोकांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी निर्भयाला न्याय मिळाला, अन्य कन्यांनाही न्याय मिळायला हवा अशी घोषणा लिहीलेला फलक तेथे फडकावला होता. विलंबाने का होईना पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याबद्दल अनेकांनी तेथे समाधान व्यक्त केले. या कुटुंबियांशी संबंधीत असलेले आकाशदीप यांनी सांगितले की, कायद्याची बरीच लढाई या कुटुंबाला लढावी लागली पण त्यात त्यांना अखेर विजय मिळाला. या आरोपींना फाशी मिळण्यात विलंब व्हायला नको होता अशी भावना उपस्थितांपैकी काहींनी व्यक्त केली. या आरोपींना फाशी देण्यात आल्याने सारा समाज सुधारेल अशी आशा करता येणार नाही पण या आरोपींना फाशी झाल्याने निदान अशा लोकांना थोडी तरी जरब बसेल अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली.
या चार पैकी एका आरोपींनी अगदी शेवटचा उपाय म्हणून पुन्हा दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर रात्री अडीच वाजता सुनावणी झाली पण त्यांनी त्याची ती याचिकाही फेटाळली गेल्यानंतर आरोपींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला.