नवी दिल्ली : अफझल गुरूला फाशी दिल्यानंतर सात वर्षानंतर तिहार तुरूंगात निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना शुक्रवारी पहाटे फासावर लटकवले जाणार आहे. त्यासाठी फासांची चाचणी प्रक्रिया गुरूवारी सायंकाळी पूर्ण केली.
मुकेशसिंह (320, पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंह यांना शुक्रवारी पहाटे फाशी देण्यात येणार आहे. तिहारमध्ये प्रथमच चार जणांना फाशी दिली जाणार आहे. आशीया खंडात सर्वाधिक मोठे कारागृह असा तिहारचा लौकिक आहे. या कारागृहात 16 हजार कैदी आहेत.
या फाशीसाठी मिरतहून पवन जल्लाद तिहार कारागृहात मंगळवारी सायंकाळी आले. त्यांनी फाशीची सर्व तयारी पूर्ण केली. जेलच्या नियमावलीनुसार कारागृह अधिक्षकांनी स्वत: जातीने दोरखंडाची चाचणी आणि फाशी स्थळाची तपासणी केली. त्यानंतर आरोपींच्या वजनाच्या पाच पट वजनाचे वाळूचे पोते बांधून दोरखंडाची मजबुती तपासली.
फाशी देताना अधिक्षक, उप अधिक्षक प्रमुख वैद्यकीय अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य आहे. किमान 10 पेक्षा हवालदार, वॉर्डन, आणि दोन हेड कॉन्स्टेबल, हेड वॉर्डन, आणि तेवढ्याच संख्येने कारागृहाचे सशस्त्र जवान तेथे तैनात करावेत, असे त्यात नमूद केले आहे.
फाशी पाहण्यासाठी दोषीच्या कुटुंबियांना उपस्थित राहता येत नाही. फाशीची प्रक्रिया होईपर्यंत सर्व कैद्यांना कारागृहात बंद ठेवण्यात येते. त्यानंतर मृतदेह फासावरून काढण्यात येतात. दोषींची चार दिवस आधी वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा लागतो.
प्रत्येक फाशीसाठी दोन दोरखंड राखीव ठेवण्यात येतात. दोरखंड आणि अन्य साहित्य चाचणीनंतर एका स्टीलच्या बॉक्समध्ये सीलबंद करून ठेवण्यात येते. जर कैद्याला हवे असेल तर त्याला हव्या त्या धर्मगुरूला भेटण्याची परवानगी देण्यात येते.
फाशीच्या दिवशी सकाळी कारागृह अधिक्षक, जिल्हाधिकारी/अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी त्याची कारागृहात भेट घेतात. कैद्याचे इच्छापत्र अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर साक्षांकित करण्यात येते. त्याला फासाजवळ नेण्याच्या आधी त्याला फाशीचे दृष्य दिसू नये म्हणून काळी टोपी घातली जाते. त्यानंतर वॉर्डन आरोपीला धरून ठेवतो. जल्लादाने त्याच्या खालील गाळ्याचे बोल्ट काढल्यानंतर कारागृह अधिक्षकांच्या इशाऱ्यानंतर वॉर्डन त्याला सोडतो.
कैद्याच्या मृतदेहावर त्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात येतात. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देतात. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेताना ऍम्ब्यूलन्सचा वापर होतो.