भीमा-कोरेगाव प्रकरण ः नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : भीमा-कोरेगाव दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 4 एप्रिल रोजी साक्ष देणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन वर्षांपूर्वी झालेली भीमा-कोरेगाव दंगल ही सुनियोजित होती, ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे पवार यांनी यापूर्वीच आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
त्यानुसार चौकशी आयोगाने पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी बोलावले आहे, असे मलिक यांनी सांगितले. मागील मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य केलेले नाही.
तसेच प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून त्यांनी तसे कळवलेही नाही, असेही नवाब मलिक म्हणाले. चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेलच. राज्य चौकशी आयोगाची मुदत ही 8 तारखेला संपणार असली तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
करोनामुळे आयोगाची सुनावणी मुंबईत
‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात 30 मार्च ते 4 एप्रिल, 2020 या कालावधीत होणार आहेत. सुनावणीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या पुणे तसेच मुंबई येथील कार्यालयात लावण्यात येईल. अत्यावश्यक कारणाशिवाय आयोगाच्या कार्यालयास भेट देऊ नये, असे आवाहनही आयोगाच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.