अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचा दावा; औद्यागीक उत्पादन वाढेल
नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतातील सर्व व्यवहार अंशतः बंद झाले आहेत. त्याचा व्यापारासह उत्पादन क्षेत्र आणि निर्यातीवर परिणाम झाला आहे. मात्र करोना व्हायरसचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नसल्याचा दावा अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात औद्योगिक उत्पादन काही प्रमाणात वाढल्याचे आणि महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ संसदेमध्ये अनुराग ठाकूर यांनी ही आकडेवारी पुढे केली.
मात्र वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे आणि नागरिकांच्या प्रवासावर मर्यादा आल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग, विमान वाहतूक, हॉटेल्स, पर्यटन, माहिती-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रावर प्रचंड परिणाम झाल्यामुळे या क्षेत्रातून मदतीसाठी ओरड सुरू झाली आहे.
मात्र भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि यातून भारत लवकरच सावरेल असा दावा ठाकूर यांनी केला. बऱ्याच क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मात्र भारत यातून लवकर सावरेल आणि दीर्घ पल्ल्यात भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा कसलाही परिणाम होणार नसल्याचे त्यांना वाटते. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीच्या काळात बराच परिणाम झालेला आह.
आता त्यातून भारतीय अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे. आगामी काळात औद्योगिक उत्पादन वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वस्त इंधनाचा फायदा घेण्याची संधी
ते म्हणाले की, उलट जागतिक मंदीमुळे क्रुडचे दर कमी झाल्यामुळे भारताला यातून मोठी संधी मिळणार आहे. भारतीय उद्योजकांनी या संधीचा फायदा घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा यात फायदाच होणार आहे.
निर्यातदारांना या संधीचा फायदा घेता यावा याकरिता आम्ही निर्यातदाराशी सतत संपर्क साधून आहोत. त्यांच्या अडचणी सोडवून त्यांना भांडवल पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
भारताच्या परदेशातील राजदूतांना कच्च्या मालासाठी चीनशिवाय पर्यायी व्यवस्था सांगण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एक दीड महिन्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुरेशा क्षमतेने आगेकूच करेल असे त्यांनी सांगितले.