थिरुवनंतपुरम : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारताकडे जाणारी विमान उड्डाणे रद्द केल्याने किमान 300 केरळवासीय क्वालालंपूर विमानतळावर अडकले आहेत.
त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आहेत. अडकलेले लोक फिलीपिन्स, कंबोडिया आणि मलेशियासह विविध देशांतून आले आहेत. सर्व विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे परत भारतात येऊ शकत नाही. पुन्हा फिलीपाईन्सलाही जाऊ शकत नाही, तसेच भारत सरकारचीही माघारी नेण्याची तयारी नसल्याचे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
भारत सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडून सुरू आहे, असे या विमानतळावर अडकलेल्या विद्यार्थिनींनी व्हिडीओ संदेशाद्वारे काही वृत्तवाहिन्यांना कळवले आहे.
क्वालालंपूर विमानतळावर तासन तास वाट पाहणाऱ्यांमध्ये देशातील विविध भागांतील बरेच लोक आहेत, असेही या विद्यार्थिनीने म्हटले आहे. “बोर्डिंग पास’घेतल्यानंतर सर्व विमान उड्डाणे रद्द झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
केरळ, बेंगळुरू आणि चेन्नईची उड्डाणेही रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. भारतीय अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क झाला असल्याचे राज्यसभेचे खासदार जोस के मणी म्हणाले.
अडकलेले बहुतेक प्रवासी हे भारतीय नागरिक आहेत, असे ते म्हणाले. व्हिडीओ संदेशाद्वारे संपर्क साधणाऱ्या एका अन्य विद्यार्थिनीला अश्रु अनावर झाले.