इस्लामाबाद – भारतात दिल्ली शहरात झालेल्या दंगलींवरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून जोरदार आगपाखड केली आहे. त्यांनी म्हटले आहे की नाझींनी 1930 मध्ये जर्मनीत ज्युंच्या विरोधात जे अत्याचार केले तशीच मोदींची मानसिकता आहे हे मी नेहमी सांगत आलो आहे. मोदींनी हिटलरच्या पावलावर पाऊल टाकून आता आपली धोरणे राबवणे सुरू केले आहे. त्यांनी गुजरात मध्ये मुख्यमंत्री असताना जे केले तेच त्यांनी आता दिल्लीत केले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
याच संबंधात दुसऱ्या एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की दिल्ली दंगलींची जी छायाचित्रे आता प्रसारीत होत आहे त्यात दिल्लीतील मुस्लिमांच्या घरांवर, व्यवसायांवर आणि मुस्लिम स्मशान भुमी तसेच मशिदींच्या स्थळांवर हल्ले करून मुस्लिमांना ठार मारण्यात आले आहे आणि त्यांना जाळण्याचाही प्रकार घडला आहे असे स्पष्ट दिसते आहे. मोदींच्या या फॅसिस्ट राजवटीची जगाने दखल घेऊन हा सारा प्रकार थांबवला पाहिजे असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.