संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनी दिल्लीत झालेली दंगल आणि त्यात झालेली प्राणहानी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तेथील लोकांनी कमालीचा संयम बाळगून हिंसाचार टाळला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
महात्मा गांधी यांच्या शिकवणुकीचा आदर्श सर्वांनीच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही प्रतिक्रीया त्यांच्या प्रवक्त्याने प्रसार माध्यमांना ऐकवली.
ते म्हणाले की दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस चिंतीत आहेत. त्यांनी तेथे झालेल्या मोठ्या जीवितहानी बद्दल तीव्र दु:खही व्यक्त केले आहे.
स्वता सरचिटणीसांनी आयुष्यभर महात्मा गांधी यांची शिकवणूक प्रमाण मानून त्यानुसारच आपले जीवन व्यतीत केले आहे. त्यामुळे सर्वांनीच ही शिकवणुक आचरणात आणली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत ज्यांना निदर्शने करायची आहेत त्यांना शांतपणे ती निदर्शने करू दिली पाहिजेत, पोलिस व सुरक्षा दलांनीही तेथे संयम बाळगला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. या दंगलीत आत्तापर्यंत 38 जणांचे बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत.