मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत राज्य सरकाने 348 गुन्हे मागे घेतले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली. आमदार शरद रणपीसे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता.
कोरेगाव भीमा प्रकरणात अनेक लोकांवर 649 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले. चौकशी संपल्यावर उर्वरीत गुन्हे मागे घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी आयोग स्थापन करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थे कडे सोपवल्याने आम्ही नाउमेद झालो आहोत, असे ते म्हणाले.
मागील सरकार त्यांच्याविरूध्द बोलणाऱ्यांना शहरी नक्षली असे संबोधत होते, अशी तक्रार करणारी अनेक शिष्टमंडळे आपणास भेटली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात नोंदवलेले किती गुन्हे मागे घेतले, अशी विचारणा भारतीय जनता पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी केली. त्यावेळी देशमुख म्हणाले, 548 गुन्ह्यांपैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले. नाणार रिफायानरी फ्रकल्पाशी संबंधीत पाच गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.