नगर – जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या सेस अंतर्गत शेती औजारे खरेदीसाठी 50 हजारांचे अनुदान देण्यात येत होते. आता त्यात 25 हजारांची वाढ करण्यात आलेली असून 75 हजारांचे अनुदान निश्चित करण्याचा निर्णय कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा सभापती काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी समिती सदस्य संदेश कार्ले, दत्तात्रय काळे, सचिव सुनीलकुमार राठी, विलास गायकवाड आदी उपस्थित होते.
पिकांवर होणाऱ्या रासायिनिक कीटकनाशकांच्या फवारण्या तसेच रासायनिक खताचा वापर यामुळे मानवाचे आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. यासाठी विषमुक्त अन्न मिळविण्यासाठी सेंद्रीय शेतीची आवश्यकता असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या सेसमधून प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, असा आदेश सभापती दाते यांनी या वेळी दिला.
सेस अंतर्गत पाइप खरेदीसाठी चार हजारचे अनुदान दिले जाते.
त्यात वाढ करून ते दहा हजार करावे, अशी मागणी सदस्य संदेश कार्ले यांनी केली. ती मागणी मान्य करून या पुढे पाइप खरेदीसाठी दहा हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, यामध्ये शेतकऱ्यांनी विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत.
वीज वितरण कंपनीकडून वीजजोड अथवा सौर विद्युत पंप न मिळाल्याने योजनेत मंजूर असलेले विद्युत पंप, ठिबक, तुषार इयत्ता बाबींचा लाभ लाभार्थ्यांने देता येत नसल्याने, या विहिरींचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, याबाबत जे शेतकरी वीज जोड उपलब्ध होईपर्यंत जनरेटर वापरून वीज पंप चालविण्यास तयार असतील तर अशा शेतकऱ्यांना त्याप्रमाणे हमी पत्र घेऊन लाभ देण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.