नगर – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षेचे नियोजन पूर्ण केलेले आहे. आज (ता. 18) पासून बारावीच्या परीक्षेस सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होणार आहे.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 66 हजार 908 विद्यार्थी बसले असून, 99 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा कालावधीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त केली आहेत. या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून 21 जणांची निवड केली आहे. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी सर्वच केंद्रांवर बैठी पथके नियुक्त केली जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या आसनव्यवस्थेची तयारी करण्यात आलेली असून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे. तालुकानिहाय बारावीची विद्यार्थी संख्या नगर ग्रामीण ः 1667, अकोले ः 3794, जामखेड ः 3344, कर्जत ः 3550, कोपरगाव ः 4586, नेवासे ः 4029, पारनेर ः 3443, पाथर्डी ः 6247, राहुरी ः 2924, संगमनेर ः 6933, शेवगाव ः 4723, श्रीगोंदे ः 3091, श्रीरामपूर ः 4378, राहाता ः 4660, नगर शहर ः 9506.
गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता समिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी समितीचे अध्यक्ष असून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप थोरे सचिव आहेत. विविध प्रशासन अधिकाऱ्यांची सात भरारी पथके कार्यरत असणार आहेत. परीक्षा काळात केंद्राच्या आवरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.