नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून कॉंग्रेसचे दिल्ली शाखेचे निरीक्षक पी. सी. चाको आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी आपआपल्या पदांचे राजीनामे देण्याची तयारी दर्शवली आहे. तथापी दिल्लीतील पराभवाचे विश्लेषण करताना पी. सी. चाको यांनी या पराभवाचा ठपका दिवंगत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर ठेवल्याने चाको यांचा पक्षातील अनेकांनी निषेध केला आहे.
चाको यांनी एका वृत्तसंसस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की शीला दीक्षित मुख्यमंत्री असतानाच्या काळातच दिल्लीतील कॉंग्रेसच्या पतनाला सुरूवात झाली आणि त्यांच्या काळातच केजरीवालांचा राजकीय उदय झाला आहे. कॉंग्रेसची संपुर्ण वोट बॅंक आम आदमी पक्षाने बळकावली आणि ती आम्हाला परत मिळू शकली नाहीं हे आमच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. ही प्रक्रिया शीला दीक्षित यांच्या काळातच सन 2013 मध्ये सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला.
तथापी चाको यांच्या या विधानावर कॉंग्रेसच्या अनेकांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. पहिला आक्षेप माजी खासदार मिलिंद देवरा यांनी नोंदवला. ते म्हणाले की शीला दीक्षित या आदरणीय नेत्या होत्या व जनमानसात त्यांचे नाव मोठे होते. त्यांनी दिल्लीतील मतदारांचा विश्वास जिंकला होता म्हणूनच पक्षाला येथे लागोपाठ तीन वेळा विजय मिळू शकला असेही देवरा यांनी म्हटले आहे.
शीला दीक्षित यांचे गेल्या वर्षी जुलै महिन्यात निधन झाले. त्यानंतर दिल्लीत पक्षाला नेतृत्वाचा चेहराच मिळू शकलेला नाही.