अमृता पाटील यांची सरकारला आर्त साद; पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध नेत्यांचे प्रयत्न सुरू
सातारा – “चीनमधील वुहान शहरात आमची लेक अश्विनी अडकली असून तिथली स्थिती आता गंभीर झाली आहे. चीन सरकारने शहरात पूर्ण नाकाबंदी केल्याने जीवनावश्यक वस्तू मिळणेही मुश्कील झाले आहे. अश्विनीच्या घरातील अन्नधान्यही आता संपले आहे. पाणी मिळत नाही, अशा अवस्थेमुळे चिंता वाढली आहे. तिला मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत,” अशी आर्त साद अश्विनीची आई सौ. अमृता पाटील यांनी घातली आहे.
आमची ती एकुलती एक कन्या आहे. चीनमधील गंभीर संकटाच्या वेळी ती तिथे अडकून पडल्याने आमच्या वेदना समजून घेऊन सर्वांनी तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्या सांगत होत्या. अश्विनी अडकल्याचे समजताच सातारकरांसह आमच्या मित्रपरिवाराने आमच्या कुटुंबियांना धीर दिला असून सारे भारतीय अश्विनीच्या पाठीशी आहेत, ही भावना आम्हाला वेगळी ताकद देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
करोनाच्या साथीने चीनमध्ये सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. साताऱ्यातील अश्विनी अविनाश पाटील आपल्या पतीसह वुहानमध्ये राहत असून तिला करोनाचा काहीही त्रास नाही; परंतु साथीमुळे चीन सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे वुहानमधील कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. बाहेरून काही आणता येत नाही, या स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी अश्विनीशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तिला परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यामार्फत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार यांनीही अश्विनीला मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे तिचे वडील अविनाश पाटील यांनी सांगितले. दिल्लीतील दूतावासाशी संपर्क झाल्याचेही त्यांनी सांगितले.
अश्विनीचा विवाह पोलंडचा नागरिक ऍलन गोल्डमन यांच्याशी झाला. हा विवाह “ऍरेंज’ असून दोन्ही घरांच्या रितसर मान्यतेने, एकमेकांना समजून घेत झाला. गोल्डमन वुहान शहरात नोकरी करीत होते. अश्विनीही नोकरीच्या प्रयत्नात होती. या दाम्पत्याने युरोप दौऱ्यासाठी नियोजन केले होते. त्यासाठी ब्रिटिश दूतावासाकडे व्हिसासाठी अर्ज केले होते. त्यामुळे अश्विनीचा पासपोर्ट ब्रिटिश दूतावासामध्ये अडकला आहे. तो मिळण्यापूर्वीच करोनाचे संकट आले. प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांना विमानाद्वारे मायदेशी नेले. त्यावेळची स्थिती पाहून ऍलन गोल्डमन यांनाही पोलंडला पाठविण्यात आले.
मात्र, अश्विनी तिथेच अडकून पडली. अश्विनीचा स्वभाव धाडसी आहे. ती वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून दांडपट्टा खेळात तरबेज आहे. साताऱ्यातील वस्ताद बबनराव शेख यांच्या तालमीत ती तयार झाली. त्यामुळे आहे त्या स्थितीशी ती संघर्ष करीत आहे. मात्र, इथे आम्ही चिंतेत आहोत. कारण तिकडे अन्नधान्य नाही, पाणी नाही, स्थानिक भाषा समजत नाही, अशा स्थितीत तिचे काय हाल होत असतील, याची चिंता आम्हाला वाटत राहते, असे सौ. अमृता पाटील यांनी सांगितले. भारत सरकारकडून दुसरा पासपोर्ट तयार करून तिला इथे आणण्याची तातडीने व्यवस्था करावी, तसेच तिच्याबरोबर आणखी 70 ते 80 भारतीय तिथे अडकले आहेत, त्यांनाही मायदेशी आणावे, अशी विनंती त्यांनी केली.
अश्विनीशी आरोग्य राज्यमंत्र्यांनी साधला संवाद
करोना विषाणूचा उद्रेक झालेल्या चीनच्या वुहान प्रांतात मूळची सातारा येथील असलेली अश्विनी पाटील ही तरुणी अडकली आहे. मायदेशी परतण्याबाबत तिने काल सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाची दखल घेत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी तिच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. तिला मायदेशी परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री पाटील यांनी काल चीनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अश्विनीला सुखरूप मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील 26 विद्यार्थी दोन आठवड्यांपूर्वी चीनमधून भारतात परतले असून त्यांना आणण्यात राज्यमंत्री पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे विद्यार्थी सध्या निरीक्षणाखाली असून त्यांना लवकरच घरी सोडण्याबाबत आरोग्य विभागामार्फत कार्यवाही केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.