चीनमध्ये जाणाऱ्या एअर इंडिया, इंडीगोच्या विमानसेवा स्थगित
नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. एअर इंडिया, इंडिगोसारख्या देशातल्या प्रमुख विमानसेवांनी भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या विमान सेवा स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 131 लोकांचे बळी गेले आहेत. तर हजारो लोकांना कोरानाची लागण झाली आहे. कोरोनामुळे एअर इंडियाची विमानसेवा 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान स्थगित करण्यात आली आहे. तर इंडिगोची भारत- चीन विमानसेवा 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीदरम्यान स्थगित करण्यात आली आहे.
विमानसेवा रद्द करण्यात आल्याने ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट काढले आहेत त्यांना तिकिटाचे संपूर्ण पैसे परत देण्यात येतील, अशी माहिती इंडिगोने दिली आहे. गेल्या नऊ दिवसांत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनमधून आलेल्या 3 हजार 750 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मुंबईबरोबरच दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, चैन्नई विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणू आणखी घातक होत आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 131 पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूच्या 5300 प्रकरणांना पुष्टी मिळाली आहे. जपानने आपल्या 200 नागरिकांना शहरातून एअरलिफ्ट केले आहे. अमेरिकेने 240 नागरिकांना हवाई मार्गाने बाहेर काढले आहे. तर भारत सरकारनेही आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे.