सध्या आपण अशा युगात जगतो की ज्यावेळी स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणं गरजेचं झालं आहे. निदान जे सुशिक्षित, आरोग्यपूर्ण, आपल्या गरजा भागवून वर पैसा मिळवणारे, (तथाकथित) बुद्धिवादी. ज्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा आरोग्यशिक्षण या मूलभूत गरजा पुरवणंही शक्य नाही, अशी परिस्थिती आहे. त्यांना एक माणूस म्हणून तरी आपणच मदत करायला नको का?
मला यावरून एक फार जुनी घटना आठवली. एक विवस्त्र स्त्री आमच्या घराजवळ मोठमोठ्यानं रडत ओरडत आली. माझं हृदय शतशः विदीर्ण झालं. मी आईला सांगितले, “तिला जो कपडा असेल तो दे’ आई म्हणाली, अरे, ते असं जमवून ते विकतात’ मी उत्तरलो, “मला हे पाहावत नाही. तू दे नाहीतर मी हाताला येईल ती चादर, साडी, इतर कपडे काहीही देईन.’ आईनं शेवटी काही दिलं. पण अशी वेळच मुळी का यावी? दुसऱ्याला मागणं कोणाला आवडत असेल असं मला वाटत नाही. कारण मागताना माणूस खालच्या मानेनं मागतो, खालच्या पायरीवर उतरतो.
लाओत्से या गुरूचा एक शिष्य न्यायाधीश झाला. त्याच्यासमोर एकदा चोरीचा खटला आला आणि त्यावेळी त्यानं ज्याच्याकडे चोरी झाली त्याला एक वर्ष तर चोराला फक्त सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली. हा प्रकार राजाला समजला तेव्हा त्यानं विचारणा केली. शिष्य म्हणाला, “श्रीमंतानं साठवलं म्हणून तर चोरानं चोरी केली. दोष श्रीमंताचा आहे.’
राजा म्हणाला, “अर्थातच विचार केला तर हे बरोबर वाटतं. पण मग या भावना आहेत. पण, आपण माणूस आहोत. शेकडो, हजारो नाही तर लाखो वर्षे आपल्या भावना विकसित होत आल्या आहेत. ऑक्सफर्ड डिक्शनरीत भावनांना सातशे शब्द आहेत, पण लाखो वर्षांनंतर आपल्या भावनात नुसती भर पडली नाही तर त्या उन्नत होण्याची अपेक्षा आहे. आपण मात्र आज उलटेच वागतो आहोत. जातीधर्म पाळणे, दुसऱ्याला तुच्छतेने वागवणे, नुसती शिवीगाळ नव्हे तर मारामारी व मारून टाकण्यापर्यंत माणसे जात आहेत. अपघातात जखमींना मदत न करता फोटो काढणे, खोटं बोलणे, फेसबुकचा उपयोग करून कलावंत नेत्यांना त्रास देणे, महिला व मुलांचा अवमान असे कितीतरी गुन्हे पाहिले तर आपण पुन्हा मागे चाललो आहोत असं वाटतं.
शिक्षण काय तर्क लढवायला, वादविवाद करायला, दुसऱ्यांना मारण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे का? कायदा तर प्रत्येकाच्या प्रगतीसाठी, सुरक्षित राहण्यासाठी असेल तर काही श्रीमंत, पुढारी, खलप्रवृत्तीचे लोक त्याचा अमर्याद फायदा घेताना दिसतात. ज्यांच्यावर सामान्य जनता विश्वास ठेवते ते साहित्यिक, कलावंत, नेतेही जातीधर्माच्या आहारी जातात आणि आपल्या अनुयायांनाही तिकडं नेतात. पण सगळीकडेच अंधार नाही. तरुण-तरुणी सुशिक्षित झाल्यानंतर नोकरी सोडून आदिवासी, अशिक्षित, खेडी यांच्यासाठी काम करताना दिसतात. अनेक व्यक्ती, अनेक संस्था, संघटना यासाठी प्रयत्न करत आहेत. काही वृत्तपत्रे व दूरचित्रवाहिन्याही त्या त्या संस्था शोधून त्यांच्या पाठीवर कौतुकाची, प्रेमाची, शाबासकीची थाप देत आहेत. अनेक कर देणारे लोक आणि कंपन्या समाजाच्या तळा-गाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
राजकारणातून समाजवाद नाहीसा झाला तरी तो जनतेत मात्र असतो. आपण उपाशी शेजारच्याला जेवण देतोच, दिलं पाहिजे. काहीवेळा स्वतः आणि कुटुंबाच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. आपण जर अभिमानानं स्वतःला प्रगत माणूस म्हणवत असू तर आपल्या भावनाही उन्नत झाल्या पाहिजेत. फक्त स्वार्थ पाहणं आपण थांबवायला हवं.
दुसऱ्याचं समाधान तर पाहायला हवंच पण निःस्वार्थ निरपेक्ष प्रेम, अकारण आनंद, दुसऱ्याला सहज क्षमा करणे, आस्था ठेवणे, आपण दुसऱ्याविषयी कृतज्ञ राहणे, नम्र वागणं, सहनशिलता, आपण स्वीकारलेलं काम आनंदानं आणि एकाग्र होऊन करणे अशा अनेक उन्नत भावना आहेत. संत विनोबांनी या उन्नत भावनांनाच दैवी संपत्ती असं म्हटलं आहे.
आणि उन्नत भावना असतील तरच आपण बालकवींची-
“आनंदी आनंद गडे। इकडे तिकडे चोहीकडे’ या कवितेमधला आनंद लहान मुलाच्या निरागसतेनं अनुभवू शकतो. गाणं गुणगुणत काम करू शकतो. यानं काम सहज सोपं होतं. आनंद पसरत जातो. आपलं काम होऊनच जातं.
सहजानंद