माधव विद्वांस
ज्यांनी महाराष्ट्र गीत लिहिले तसेच एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन अशी सुंदर नाटके लिहिली असे कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे आज पुण्यस्मरण. त्यांच्या पाच नाटकांनी मराठी नाट्यसृष्टी समृद्ध झाली. “मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा’ या त्यांच्या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्राचे यथार्थ दर्शन घडविले आहे. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले व जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील हे स्फूर्तिगीत सगळ्यांच्याच आवडीचे आहे.
त्यांचा जन्म 26 मे 1885 रोजी गणदेवी जिल्हा नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांचे जीवन अल्पायुषीच ठरले. अवघ्या 34 व्या वर्षीच त्यांचे निधन झाले. ते 8 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गणेश रघुनाथ गडकरी यांचे 24 सप्टेंबर 1893 रोजी निधन झाले. त्यामुळे व गरिबीमुळे त्यांच्या शिक्षणास अडथळा निर्माण झाला. शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी वयाच्या 17व्या वर्षीच “मित्रप्रीती’ नावाचे नाटक लिहिले होते. ते मॅट्रिक झाले व पुणे येथे फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु गणित विषयात प्रगती होत नसल्याने त्यांनी कॉलेज सोडले. त्यांनी आवडीनिवडीचा पाठपुरावा होऊ शकेल असे शिक्षण घेतले व पुण्याच्या “ज्ञानप्रकाश’मध्ये उपसंपादक म्हणून काम करू लागले. काही काळ त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणूनही काम केले.
कालांतराने किर्लोस्करांचे नाटक कंपनीत ते नाट्यगीते लिहू लागले. किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या “रंगभूमी’ नावाच्या मासिकातून तसेच हरिभाऊ आपट्यांच्या “करमणूक’ नियतकालिकातून त्यांनी कविता, लेख लिहिले. त्यांनी “राजसंन्यास’ नाटकासाठी छ. शिवबाराजे यांच्यासाठी “गुणि बाळ असा, जागसि का रे वायानीज रे नीज शिवराया!’ हे अंगाई गीत लिहिले होते. “राजसंन्यास’ व “वेड्यांचा बाजार’ ही दोन नाटके मात्र अपूर्ण राहिली. त्यांनी जोडाक्षरे टाळून “चिमुकली इसापनीती’ हे लहान मुलांसाठी पुस्तक लिहिले. त्यांनी “गोविंदाग्रज’ या टोपणनावाने कविता लिहिल्या तर “बाळकराम’ या टोपणनावाने विनोदी लेखन केले.
वर्ष 1913मध्ये त्यांचे “प्रेमसंन्यास’ हे नाटक रंगभूमीवर आले. त्यांचा “वाग्वैजयंती’ हा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील मुक्तछंदातील ते छंदबद्ध कवितेपर्यंत कविता वैविध्यपूर्ण आहेत. छोट्या चार ओळींच्या कवितेपासून 10 पाने भरतील एवढे दीर्घकाव्य हे त्यांचे वैशिष्ट्य. अगोदर कवितेची पार्श्वभूमी सांगून मग बऱ्याच कविता त्यांनी वाचकांच्या पुढे ठेवल्या. त्यामुळे अधिक परिणामकारक झाल्या. “वाग्वैजयंती’मधील “हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ हे त्यांचे ध्वनिमुद्रित झालेले भावगीत प्रकारातील पहिले भावगीत होय. या कवितेत 18 कडवी आहेत पण त्यातील चारच कडवी संगीतबद्ध झाली. पिलू रागातील हे गीत बापूराव पेंढारकर यांनी गायले.
वर्ष 1926च्या गडकरी यांच्या 7व्या पुण्यतिथीला त्यांनी हे गीत ध्वनिमुद्रित करून घेतले. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या. “एकच प्याला’ या नाटकातील सुधाकर, सिंधू, तळीराम, घनःश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी त्यांनी काही तासांपूर्वीच “भावबंधन’ हे नाटक पूर्ण केले होते. त्यांची नाटके साहित्यिक व नाट्य समीक्षकांनी गौरवलेली होती. 23 जानेवारी 1919 रोजी या महान नाटककाराचे सावनेर येथे निधन झाले.