बारामती तालुक्यात शासकीय दक्षता समित्या पडद्याआड : गोरगरिबांची पिळवणूक
मोरगाव – बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील शासकीय परवानाधारक रॉकेल व स्वस्त धान्य दुकानदारांवर दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समिती गाव पातळीवरील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पडद्याआड झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित परवानाधारक शिधापत्रिकाधारकांची अडवणूक करण्याबरोबरच काळ्याबाजारात जादा दराने मालाची विक्री करीत आहेत. या प्रकाराबाबत तालुका पातळीवरील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे.
गावातील दक्षता समित्यांची स्थापना झाल्यापासून बैठकच झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
गावातील शिधापत्रिका धारकांना रॉकेल व धान्याचा व्यवस्थित पुरवठा व्हावा व स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आवर घालता यावा यासाठी तालुक्यातील सर्वच दक्षता समित्या कार्यरत आहेत. अनेक गावातील दक्षता समिती सदस्यांना आपण सदस्य आहोत हेच माहित नाही. त्यामुळे या समित्यांचा कारभार किती पारदर्शक आहे हे सुज्ञ नागरिकांना आता समजू लागले आहे.
या दक्षता समितीतील सदस्य प्रशासन व शिधापत्रिकाधारक यांच्यामध्ये सुसंवाद नसल्याने ग्रामीण भागात गैरसोय होत आहे. स्वस्त धान्य दुकानदारावर अंकुश राहिला नसल्याने ते आलेल्या मालाची काळ्याबाजारात विक्री करत असल्याचे अनेक तक्रारी आहेत. या प्रकारामुळे हक्काच्या धान्यापासून वंचित राहत असून केवळ कागदोपत्री असलेल्या या समित्या काय कामाच्या असा सवाल शिधापत्रिकाधारक करीत आहेत.
सध्या या समित्यांकडे गाव पातळी व तालुका पातळीवरील शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून या समित्यांच्या बैठक काही होत नाही आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारक व दुकानदार यांच्या अडचणीत शासनापर्यंत पोहोचत नाहीत. याबाबत संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून दक्षता समिती याबाबत जनजागृती करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होऊ लागली आहे. मात्र, संबंधित प्रशासन बधीर झाल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे.
आधार कार्ड लिंकिंगच्या नावाखाली लूट
सध्या धान्य वितरण व्यवस्था ही प्रत्येक गावात मशिनच्या साह्याने होत आहे. या मशीनच्या माध्यमातून धान्य मिळण्यासाठी आधार कार्डचे नंबर रेसलिंग कार्ड जोडणे गरजेचे आहे, परंतु असंख्य रेशनिंग कार्ड धारकांचे नंबर अद्यापही यंत्रणेच्या विस्कळीतपणा मुळे रेशनिंग कार्डशी जोडण्यात आलेले नाहीत. आशा शिधापत्रिकाधारकांना कार्ड लिंकिंग झाल्याशिवाय धान्य देता येणार नाही, असे सांगून त्यांना धान्य देण्याचे टाळून त्यावर डल्ला मारला जात आहे.